Aurangabad-Chalisgaon rail survey completed !
मुख्यपान » मराठवाडा » बातम्या
दौलताबाद -चाळीसगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण
- - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016 - 12:00 AM IST
Share...
more... Link:
click here Tags: railway, marathwada
औरंगाबाद - महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा आणि मराठवाड्यासाठी माईलस्टोन ठरणारा औरंगाबाद-चाळीसगाव नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. मनमाडमार्गे फेरा वाचविण्यासाठी दौलताबाद ते चाळीसगाव हा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी सर्वेक्षण करण्यास मान्यता देण्यात आली होती. हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. हा मार्ग उत्पन्नाच्या दृष्टीने लाभदायी ठरणार असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आला असल्याची माहिती मराठवाड रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी दिली.
वर्ष 2013-14 च्या रेल्वे अर्थसंकल्पात दौलताबाद ते चाळीसगाव या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली होती. हा 70 किलोमीटरचा मार्ग उभारल्यास उत्तरेकडील राज्यांकडे मराठवाड्यातून जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांसाठी उपयुक्त असणाऱ्या या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यास मान्यता देण्यात आली होती. हरिद्वार रुडकी येथील आयआयटी कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. या कंपनीने मार्च 2015 मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, रेल्वे बोर्डाला या विषयीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. हा मार्ग फायदेशीर ठरणार असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. यामुळे हा मार्ग उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
केंद्रीय मंत्री मार्गाविषयी अनुकूल
दौलताबाद ते चाळीसगाव या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. नॅशनल हायवे ऍथॉरिटीच्या वतीने सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्ग 211 चे काम हाती घेण्यात आले आहे. कन्नडच्या ऑट्राम घाटात बोगदा खोदून येथून रस्ता तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच बोगद्यातून रेल्वे मार्ग उभारण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याची मागणी ओमप्रकाश वर्मा यांनी 26 ऑक्टोबरला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. या वेळी कन्नड घाटात उभारण्यात येणाऱ्या बोगद्यातून रेल्वे आणि रस्ते असे दोन्ही मार्ग उभारण्यास गडकरी यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा
यावर्षी जानेवारी महिन्यात रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार आहे. या बजेटमध्ये मराठवाड्यातील रेल्वे मागण्यांचा नोव्हेंबरपर्यत विचार करण्यात यावा नसता 5 ते 9 डिसेंबर या दरम्यान जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा ओमप्रकाश वर्मा यांनी दिला आहे.