#Chiplun_Derailment
मालगाडी घसरली, कोकण रेल्वे ठप्प
Oct 7, 2014, 10.37AM IST
सुनील नलावडे । चिपळूण
कोकण रेल्वेच्या वालोपे स्टेशनजवळ मालगाडीचे नऊ डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चिपळूण ओव्हरहेड ब्रिजपासून काही...
more... अंतरावर हा अपघात झाला. यात रुळांचे मोठे नुकसान झाल्याने रेल्वेची वाहतूक संध्याकाळपर्यंत ठप्पच राहणार आहे.
अपघातग्रस्त मालगाडी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी रत्नागिरी- मुंबई महामार्गावरील चिपळूण ओव्हरहेड ब्रिजच्या आधी गाडीचे डबे रुळावरून घसरले. हा अपघात इतका जबरदस्त होता की ७०० मीटरपर्यंचे रुळ पूर्णपणे उखडले गेले आहेत. घसरलेल्या नऊ डब्यांपैकी सहा डबे रुळांपासून सात फूट लांब फेकले गेले. तर उरलेले तीन डबे ५० फुटांहून अधिक लांब फेकले गेले. त्यापैकी एक डबा जवळच असलेल्या वस्तीतील झोपड्यांवर पडल्याने ते झोपडे पूर्णपणे दाबले गेले. अपघातग्रस्त झोपडीत कोणी होते का, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. थंडीमुळे कोकण रेल्वेच्या रुळांवरील जॉइण्टला तडे गेले आहेत. याच तड्यांचा फटका मालगाडीला बसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच मडगावहून रेल्वे अधिकारी रवाना झाले आहेत. तसेच मदत व बचावकार्याची सामुग्री घटनास्थळी पोहोचविण्यात आली आहे. अपघाताचे गांभीर्य पाहता डबे हटवण्याचे आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
अनर्थ टळला!
चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थीतीचा आढावा घेतला. ही मालगाडी आणखी पुढे जाऊन घसरली असती तर ती चिपळूण ओव्हरहेड पुलावरून थेट महामार्गावर कोसळली असती. सुदैवाने मोठा अपघात टळल्याचे मकेश्वर यांनी सांगितले.
Source :
click here