नरखेड रेल्वे मार्गावरून धावल्या अनेक गाड्या!
पर्यायी सोय : मोर्शी, वरूडवासीयांना सुखद धक्का
मोर्शी : मोर्शी रेल्वे स्थानकावर गीतांजली एक्स्प्रेस येऊन थांबल्याचे पाहून मोर्शीकरांना काल आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर होऊन निर्माण झालेल्या अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे प्रशासनाने उपयोग करुन घेतला.
मोठय़ा प्रमाणात पाऊस बरसल्यामुळे आलेल्या नदी-नाल्यांच्या पुरामुळे वर्धेजवळ रेल्वे...
more... रुळाखालील गिट्टी आणि भराव वाहून गेल्यामुळे बडनेरा-नागपूर हा रेल्वे मार्ग अवरुध्द झाला. त्यामुळे सुरवातीला रेल्वे प्रशासनाने या मार्गावरुन धावणार्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या. काही भुसावळमार्गे वळविल्या. तथापि त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना नरखेड-अमरावती रेल्वे मार्गाची आठवण झाली. या मार्गावरुन दर आठवड्याला दोन एक्स्प्रेस गाड्या गेल्या सहा महिन्यांपासून नियमितरीत्या धावत आहेत. हा अमरावती-नरखेड मार्ग रद्द केलेल्या रेल्वे गाडयांकरिता पर्यायी मार्ग म्हणून वापरल्यास प्रवाशांची सोय होऊन रेल्वेचे होणारे नुकसान टाळता येईल, हे गृहीत धरुन रेल्वे प्रशासनाने या मार्गावरुन आधी रद्द केलेल्या अनेक रेल्वे गाडयांना मार्ग उपलब्ध करुन दिला.
त्याकरिता बडनेरा आणि नरखेड येथे या रेल्वे गाड्यांच्या विजेवर चालणार्या इंजिनसमोर डिझेल इंजिन जोडण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली होती. २0 जुलैच्या रात्री ३ वाजून ३१ मिनिटांनी या मार्गावरुन पर्यायी मार्गाचा वापर करणारी पहिली संघमित्रा एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. त्यानंतर सातत्याने या मार्गावरुन वाहतूक सुरु होती.
२१ तारखेच्या रात्री ८ वाजेपर्यंंत या मार्गावरुन एकूण २३ एक्सप्रेस गाड्या धावल्या. त्यात संघमित्रा एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, नागपूर-अहमदाबाद, पूरी-अहमदाबाद, हावडा-पोरबंदर, महाराष्ट् एक्स्प्रेस, शालीमार एक्स्प्रेस, हटीया-जयपूर, माल्दा-सूरत, एवढेच नव्हे तर दूरंतो एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस सुध्दा या मार्गावरुन धावली. २१ जूलैच्या सकाळ पासून संध्याकाळपर्यंंंत जवळपास ११ एक्सप्रेस गाडया या मार्गावरुन धावल्या. त्यातील अनेक एक्स्प्रेस गाड्या मोर्शीलासुध्दा थांबल्या.
२0 जुलैला रात्री ७.३0 च्या सुमारास मुंबई-कोलकत्ता जाणारी गीतांजली एक्स्प्रेस येथील रेल्वे स्थानकावर पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसला वाट मोकळी करुन देण्याकरिता चक्क २0 मिनीटे थांबली. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. नियमितरीत्या मोर्शीच्या स्थानकावर रेल्वे गाडया थांबत नसल्यामुळे रेल्वे फलाटावर खाण्या पिण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे गीतांजलीचे अनेक प्रवासी येथील रेल्वे स्थानकावर उतरले आणि पाणी पिऊन त्यांनी आपली तृष्णा भागविली. (तालुका प्रतिनिधी)
नरखेड-अमरावती मार्गाची उपयुक्तता सिध्द
-मागील वर्षी मोर्शी शेजारी उदखेडजवळ मालगाडीचे १३ डबे रुळावरुन घसरुन अपघात झाला होता. तत्पूर्वी या मार्गावरुन दररोज मालगाडी धावत होती. अपघातानंतर मात्र मालगाडीसुध्दा या मार्गावरुन बंद केली होती. सहा महिन्यापासून इंदोर-यशवंतपूरम आणि जयपूर-सिकंदराबाद या साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या. या गाड्या वगळता मार्गावरुन मालगाड्यांची वर्दळ बंद केली आहे. वर्धाजवळ रेल्वे मार्ग अवरुध्द झाल्यामुळे या मार्गावरुन अनेक प्रवासी रेल्वे गाड्या धावताहेत. हा पर्यायी मार्ग नसता तर प्रवाशांचे हाल झाले असते. रेल्वेचे आर्थिक नुकसान झाले असते. या मार्गावरुन दर अध्र्या तासात प्रवासी रेल्वे जात असल्यामुळे या मार्गाचे मजबूतीकरणही होत आहे. शिवाय वाहतुकीकरीता सक्षम असल्याचे सिध्दही झाले आहे. त्यामुळे या मार्गावरुन नियमितपणे मालगाड्या आणि नियमित प्रवासी वाहतुकीच्या रेल्वे गाड्या सुरु करण्यात याव्यात, मोर्शी आणि वरुडला रेल्वेचा थांबा देण्यात यावा, अशीही मागणी या अनुषंगाने अनेक संघटनांच्यावतीने केली जात आहे.